माजी मंत्र्यांची सुरक्षा काढून घेणार   

गृह मंत्रालयाचे आदेश

नवी दिल्ली : १९ माजी राज्यमंत्र्यांची सुरक्षा काढून घेण्याचे निर्देश गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. मंत्र्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही  त्यांच्यासाठी सुरक्षा तैनात होती. मात्र, केंद्र सरकारने माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची सुरक्षा सहा महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
दिल्ली पोलिसांनी गृह मंत्रालयाकडे माजी राज्यमंत्री आणि खासदारांची यादी पाठवली होती. ज्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही सुरक्षा कवच आहे. गेल्या वर्षी दिल्ली पोलिसांच्या सुरक्षा युनिटने केलेल्या लेखापरीक्षणानंतर यादी तयार करण्यात आली होती.  लेखापरीक्षणामध्ये अनेक वरिष्ठ नेत्यांना कार्यकाळ संपल्यानंतरही सुरक्षा असल्याचे आढळले होते. त्यांनतर अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली. पुनरावलोकनात अनेक माजी राज्यमंत्री पदावर नसतानाही त्यांना अजूनही संरक्षण मिळत असल्याचे आढळले. अशा व्यक्तींची यादी गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आली होती, असे अधिकार्‍याने सांगितले.
 
ज्या खासदार आणि न्यायाधीशांना सुरक्षा देण्यात आली होती ती काढून घेतली आहे.  यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातील माजी राज्यमंत्री भानू प्रताप सिंग वर्मा, पंचायती राजचे माजी मंत्री बिरेंदर सिंग, दळणवळणाचे माजी राज्यमंत्री देवुसिंह जेसिंगभाई चौहान, आदिवासी व्यवहाराचे माजी राज्यमंत्री जसवंतसिंह सुमनभाई भाभोर आणि परराष्ट्र व्यवहाराचे माजी राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंग यांचा समावेश आहे.
 
राज्य मंत्र्याव्यतिरिक्त गृहमंत्रालयाच्या यादीत काही खासदार आणि वरिष्ठ न्यायाधीशांची नावे देखील समाविष्ट आहेत. काही न्यायाधीशांसाठी सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे, असेही अधिकार्‍यांनी सांगितले. माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह आणि राज्यमंत्री अजय भट्ट यांची नावे देखील गृहमंत्रालयाला पाठवण्यात आली होती; परंतु त्यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, गृहमंत्रालयाने स्मृती इराणी यांची सुरक्षा आणखी सहा महिन्यांसाठी वाढवली आहे.

Related Articles